एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. मात्र मुख्यमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.
त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे. या अनपेक्षित घडलेल्या घडामोडीमुळे महायुतीची मुंबईत होणारी बैठकही लांबणीवर पडली आहे.
दरम्यान शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृहखाते तरी द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र भाजपा यासाठी तयार नाही. त्यामुळे पेच वाढला आहे. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केले आहे.
राजकीय पेचप्रसंग आला तर, विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही.
आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्या अनुषंगाने शिंदे नक्कीच मोठा निर्णय घेतील, अशा सूचक शब्दांत शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.