खेळ
खुशखबर! भारताने मालिका जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडला

तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा T20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा १०३ धावांनी पराभव केला होता. टीम इंडियाने या सामन्यात निर्धारित २० षटकात २३४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १२.१ षटकांत ६६ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावा केल्या.
या दोघांशिवाय एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने १६ धावात ४ विकेट्स घेतल्या. मावी, उमरान आणि अर्शदीपने प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि शुभमन गिलकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती, पण किशन पुन्हा एकदा अपयशी ठरला. इशान अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. कसोटी आणि वनडेनंतर शुभमन गिलने आता टी-20 मध्येही शतक पूर्ण केले आहे. अहमदाबादमध्ये गिलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाचे रूपांतर पहिल्या शतकात केले. गिलने १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.