महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले असून नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनावरांचे मृत्यू, शेतजमिनींचे नुकसान आणि नागरिकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
हवामान विभागाने आज देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वाऱ्यांचे दुहेरी संकट राज्यासमोर उभे राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये आधीच मुसळधार पावसामुळे हानी झाली असून पुन्हा एकदा येथे पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांतही तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.