ब्रेकिंग! तिरुपती लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप लावल्यानंतर खळबळ उडाली होती. आता हा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. संबंधित प्रकरण व आरोपांची चौकशी करण्यासाठी कोर्टाने आज स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी संबंधित हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे.
तिरुपती लाडू प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यीय एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या तपास पथकात सीबीआय, पोलीस आणि एफएसएसएआयचे अधिकारी असतील. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तिरुपती लाडू वादावर सुप्रीम कोर्टात सांगितले की, जर आरोपांमध्ये अगदी तथ्य असेल तर ते अस्वीकार्य आहे. एसआयटीच्या तपासावर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष ठेवले पाहिजे, अशी सूचना मेहता यांनी कोर्टाला केली.
दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट केले आहे की, तिरुपती लाडू भेसळीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे मी स्वागत करतो.