ब्रेकिंग! तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात नवा ट्विस्ट
तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्याची चरबी व मासळीचे तेल वापरले जात असल्याचे आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली असून आंध्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्वप्रथम हा आरोप केला होता. प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी बीफ टॅलो, लार्ड आणि फिश ऑईल वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते खरे असल्याचे गुजरातच्या प्रयोगशाळेत सिद्धही झाले. परिणामी गोंधळात भर पडली. आता या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी अहवाल मागवला आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसादातील गडबडीबद्दल मला कळल्यानंतर मी चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांच्याकडे मी संबंधित प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. तो आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल. यासंदर्भात मी राज्यातील अन्न नियामक मंडळाशी चर्चा करून याची चौकशी करणार आहे. अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे नड्डा यांनी सांगितले.