महाराष्ट्र
कर्नाटकच्या CM ने तोंडावर आवर घालावा, अन्यथा…

- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळत आहे. बेळगावच्या हिरेबागवाडी या ठिकाणी काल कन्नड रक्षक वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड करत रास्ता रोको केला. याचबरोबर महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेमुळे आता महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र संघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही तोंडवर आवर घालावा आणि महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत, ते तात्काळ थांबवा, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. ठाकरेंनी याबाबत एक पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे. त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं, असा धमकी वजा इशाराच ठाकरेंनी केंद्र सरकारला दिला आहे.



