राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरुणीचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी पहाटे चार वाजता अंत्यविधी परस्पर उरकून घेतल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेवर संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल केला आहे.
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी परस्पर उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली. तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.