उद्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होणार आहे. त्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेचा भयावह अंत केला. संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारले आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
किर्ती धनवे असे हत्या झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती. दीड वर्षांपूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला. दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता. तरीही दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले. दोघांच्या प्रेम विवाहाला दीड वर्षेही पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत अनिकेतचे किर्तीवरील प्रेम कमी झाले. त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून किर्तीला जाळून मारले.
दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत आणि उल्हासनगर येथे राहणारी किर्ती यांचा प्रेमविवाह झाला होता. अनिकेत आणि किर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासूनजवळचे नातेसंबंध होते. प्रेमविवाह केल्यानंतर त्यांचे रितसर लग्न लावून दिले. मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला म्हणून सून मान्य केले नव्हते. तिला सासरच्यांकडून सातत्याने जाच सुरू होता. याच कारणातून सासरच्या लोकांनी किर्तीला जाळून मारले.
मंगळवारी दुपारी किर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत होती. याचवेळी सासरच्यांनी तिला जाळून ठार मारले. याप्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांच्या इतर साथिदाराच्या मदतीने जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.