क्राईम
संतोष देशमुखांची हत्या करुन गुजरातला पळाले

- सरपंच संतोष देशमुख हत्याकांडांच्या तपासाला वेग आला आहे. या हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पकडले गेले असून, ते आता सीआयडीकोठडीत आहेत. यातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. घुले, सांगळे व आंधळे हे तिघेही एकाच वेळी फरार झाले होते. देशमुख यांची हत्या केल्यानंतर तिघेही कुठे फरार झाले होते. फरार झाल्यानंतर तिघांनाही कुणी मदत केली याचा उलगडा आता एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडीचे तपासी अधिकारी अनिल गुजर हे करत आहे.
- त्यातील काही गोष्टी आता बाहेर आल्या आहेत. 9 डिसेंबर रोजी केजजवळील टोलनाक्याजवळून देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार झाले होते. या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर तिघेही पसार झाले. ते मुंबईकडे निघून गेले होते. घुले याच्याच टाकळी गावातील एक मुलगा भिवंडीमधील एका राजकीय नेत्याच्या हॉटेल व बारमध्ये नोकरीला आहे. घुलेने त्या मुलाला संपर्क केला आणि त्याला भेटायला भिवंडीला गेला. मुलाला भेटल्यानंतर दोन मिनिटाने तो वॉशरुमला जावून येतो, सांगून गेला आणि तो पुन्हा आला. त्यावेळी त्याच्याबरोबर सांगळे, आंधळे हे दोघेही होते. देशमुख हत्याकांडाची माहिती त्या मुलाला मिळाली होती. तसेच तिघेही गुन्हेगारी पाश्वभूमीचे असल्याने त्याने त्यांच्याशी जास्त काही चर्चा केली नाही.
- इकडे राज्यात देशमुख हत्याकांड प्रकरण तापत होते. आपण पकडले जाऊ म्हणून तिघांनी थेट राज्य सोडले. तिघांनीही थेट गुजरात गाठले. गुजरातमधील गिरणार या भागात तिघेही एका मंदिराच्या भक्तनिवासात राहत होते. तब्बल पंधरा दिवस ते भक्तिनिवासात राहत होते. तेथे राहणे स्वस्त आणि जेवण फुकट होते. पैसे संपल्यानंतर आंधळे एका व्यक्तीकडे पैसे आणायला गेला. पण दोन दिवसानंतर आंधळे परत आला नाही. देशमुख हत्याप्रकरणात काय काय घडले हे त्यांनी दुसऱ्या एकाचा युट्यूबवरही बघितले. दोन दिवस आंधळे न आल्याने तो पकडला गेला असा अर्थ सांगळे आणि घुले यांनी काढला. त्यानंतर दोघेही महाराष्ट्रात आले.
- त्यानंतर आरोपी घुले याने ओळखीचे डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी सुरेखा वायबसे यांच्याशी संपर्क साधला आहे. काही पैशाची मदत आणि न्यायालयीन मदत वायबसे यांच्याकडे मागितल्याचे बोलले जात होते. आरोपींना संपर्क केल्याने वायबसे पती-पत्नीही धारूर तालुक्यातून निघून गेले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही केरळला गेलो, असे सांगितले. पण ते सीआयडी पथकाला नांदेडमध्ये सापडले. तेथून तिन्ही आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. घुले आणि सांगळे हे दोघेही पुण्यातील बालेवाडी भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, दोघांनाही चौदा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे.
- तेली हे आता सांगळे आणि घुलेकडे कसून चौकशी करत आहे. आरोपींना पळून जाण्यास कुणी मदत केली, ते तिघे गुजरातमध्ये कसे गेले, तेथून पुन्हा महाराष्ट्रात कसे आले. कोणी आर्थिक मदत केली. आंधळे कुठे आहे. या अँगलने तपास सुरू आहे.