महाराष्ट्र
देशात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; त्यात पुणे जिल्हा बनला हॉटस्पाट

- पुण्यात दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस ) रुग्णांची संख्या शंभरीपार पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे कालच एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून हे चिंतेचे कारण बनले आहे.
- जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर मोदी सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. आजाराला आळा घालण्यासाठी सरकारने सात तज्ज्ञ सदस्यांची उच्च सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्याला आजार रोखण्यासाठी सर्वतऱ्हेने मदत करणार आहे.
- देशात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. त्यातही पुणे जिल्हा हॉटस्पाट बनला आहे. रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेल्याने या आजाराविषयी भीती वाढतच चालली आहे. आजार नेमका कशामुळे होतो, याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. दुषित पाणी, शिळे अन्न आदी कारणे सांगितली जात असली तरी अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही.
- दरम्यान, प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहितीही संकलित केली जात आहे. राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा एकदा जीबीएसकडे वळले आहे.



