केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसला झाला असेल तर…

दिल्ली विधानसभा निवडणूकमध्ये एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. जणू ही निवडणूक भाजप एकहाती खेचून आणणार हे चित्र अगोदरच स्पष्ट झाले होते. मागील एक वर्षांपासून आपचे जे पानीपत झाले होते, ते सर्वांनी पाहिले. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’टी बार झाला. आपच्या ‘दारू’न पराभवाने 27 वर्षानंतर दिल्ली भाजपच्या झोळीत अलगद येऊन पडली. या पराभवाचे विश्लेषण करताना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेससह अण्णा हजारेंना चांगलाच चिमटा काढला.
केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळेच अण्णा देशाला माहिती झाले. पण गेल्या 12 वर्षात या देशावर अशी अनेक संकटे आली. देश लुटला जात आहे, विकल्या जात आहे. एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची सार्वजनिक संपत्ती घातल्या जात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये पवित्र करून घेण्यात येत आहे. पण अण्णांना त्यावर आपले मत व्यक्त करावे असे वाटत नाही, यामागचे रहस्य काय, असा खोचक सवाल त्यांनी केला.
दिल्लीत जो पराभव झाला आहे, तो केजरीवाल यांनी पण स्वीकारलेला आहे. केजरीवाल हरल्याचा आनंद अण्णा हजारे यांच्या सारख्या लोकांना आणि आपच्या पराभवाचा आनंद काँग्रेसला झाला असेल तर ते दुखद आहे, असा आसूड त्यांनी ओढला. कारण भाजप सत्तेत आली आहे, हे त्यांनी विसरू नये, याची आठवण राऊतांनी करून दिली.