ब्रेकिंग! मोठी राजकीय उलथापालथ

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला तरच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारेन, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जनतेचा कोर्टात जाऊ, असे ते म्हणाले.
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल १५६ दिवसांनंतर तिहार जेलच्या बाहेर आले. आमची ताकद वाढल्याचे देखील केजरीवाल म्हणाले होते. दरम्यान, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे केजरीवाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज दिल्ली येथील एका सभेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
केजरीवाल विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले, सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही काम करू शकणार नाही, असे काही जणांना वाटत आहे. विरोधकांनी आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मी आता जनतेच्या कोर्टात जाणार आहे. येत्या दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घरात आणि रस्त्यावर जाऊन जनतेची भेट घेणार असून जनतेचा निकाल येईपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्चीत बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.