नागपूरमध्ये दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन

सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून नागपूर शहरातील गणेशपेठ आणि महाल परिसरात आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर आता नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करुन 80 जणांना अटक केली आहे.
तसेच परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. तसेच संचारबंदी लागू करण्यात आल्याने या भागात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.
महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आतापर्यंत 1800 सोशल मिडिया अकाऊंटसची तपासणी करण्यात आली आहे.