खून करून फरार झाले, दोन वर्षे लपून बसले

२०२३ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेली दोन वर्षे फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील विजयपुर (विजापूर) येथून अटक केली आहे. सिकंदर आयुब शेख ऊर्फ सय्यद (वय ३४), जाकीर कादीर सय्यद (वय ४२) आणि अमिर अकील सय्यद (वय २३, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यात वानवडी परिसरात २०२३ मध्ये टोळक्याने तरुणाचा खून करुन त्याच्या साथीदारांना जखमी केले होते. या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हे पसार झाले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होते. या गुन्ह्यातील फिर्यादीला ते वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जीवे ठार मारण्याची धमकी देत होते.
या फरार आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिटच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. तेव्हा हे तिघे जण कर्नाटकातील विजयपुर येथे रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक विजयपुरला पोहचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना विजयपुरातून ताब्यात घेतले.



