हवामान
राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

- राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून राज्यातील बहुतांश भागाचा पारा हा 30 अंशाच्या वर गेला आहे. वाढत्या उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झालेली असतानाचा आता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सुरुवातीला हा अवकाळी पाऊस केवळ दोन दिवस पडणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा अवकाळी राज्यभरातील विविध भागांमध्ये आठवडाभरासाठी मुक्कामी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- तर मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे. राज्यामध्ये एक ते सात एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. कारण सध्या कांदा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे काम लवकर संपवावे, असेही सांगण्यात आले आहे. तर द्राक्ष बागायतदारांना आपल्या द्राक्षांवर रॅक टाकायचा सेल तर ते पाच एप्रिलनंतर टाकण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
- पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सर्व भागामध्ये दररोज एक-एक, दोन-दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. तसेच कोकणपट्टीमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे.



