राजकीय

एकदम कडक! ‘मातोश्री’चा दबदबा कायम

काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेदानंतर रखडलेली महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा आज पुन्हा सुरू होणार आहे. 

दिल्लीहून काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा तणाव निवळला आहे. राज्याच्या राजकारणातील ‘मातोश्री’चा दबदबा कायम असल्याचे यातून दिसत आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही ‘मातोश्री’चा विशेष प्रभाव होता. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती असताना भाजपचे ज्येष्ठ नेते अधूनमधून ‘मातोश्री’वर येऊन बाळासाहेबांशी चर्चा करत आणि वादाच्या विषयांवर तोडगा काढत. राजकारणाशिवाय इतर क्षेत्रातील लोकही आपापले वाद घेऊन ‘मातोश्री’वर येत.

बाळासाहेबांच्या नंतर हा दबदबा कमी होईल असे बोलले जात होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या सुरू असलेल्या जागा वाटपाच्या वादानंतर पुन्हा एकदा ‘मातोश्री’कडे मीडियाचे कॅमेरे वळले आहेत. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तोडगा निघताना दिसत नव्हता. 

नाना पटोले हे विदर्भात शिवसेनेला जागा सोडण्यास तयार नसल्यामुळे हा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट दिल्लीत चर्चा सुरू केली होती. पटोले असेपर्यंत बैठकीला जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेकडून दिल्याचे सांगितले गेले. उद्धव ठाकरे यांनीही तुटेपर्यंत ताणू नका, असा गर्भित इशारा काँग्रेसला दिला. त्यानंतर आज चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव यांच्याशी चर्चा केली. 

उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी इथं आलो होते असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, ते कशासाठी आले होते हे लपून राहिले नाही. कारण, जागावाटपाची चर्चा आजपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button