महाराष्ट्र
औरंगजेबाची कबर हटवण्यावर ठाकरे गटाची भूमिका काय?

- औरंजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. सरकारने कबर न हटवल्यास कारसेवा करू, असा इशाराही बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
- ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य केले आहे. औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. त्याकडे शौर्याची स्मारके म्हणून बघायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर ‘स्वराज्य’ निर्माण केले व जे त्यांच्या तलवारीस भिडले ते याच मातीत गाडले. त्यातला एक बादशहा औरंजेब. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जातात? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
- काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.