महाराष्ट्र
गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचा मोठा निर्णय

- सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून चार वस्तू देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा चार वस्तू मिळणार आहे. यात चणाडाळ एक किलो, सोयाबीन तेल एक लिटर, साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळेल.राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. मात्र यासाठी काही अटीसुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल.



