माढ्याला पाणी देणार म्हणून मावळत्या सूर्याची शपथ घेतली पण…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील माळशिरस येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
माढ्यात पाणी देणार असे आश्वासन १५ वर्षांपूर्वी एका नेत्याने दिले होते. यासाठी त्यांनी मावळत्या सूर्याची शपथदेखील घेतली. पण तो नेता अजूनही या भागात पाणी पोहचू शकला नाही. म्हणूनच या नेत्याची येथून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, अशी टीका नाव न घेता मोदींनी पवारांवर केली.
ही वारकरी संप्रदायाची भूमी असून मी विकसित भारतासाठी आपले आशिर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मी कोणत्याही सभेला वेळेआधीच पोहचतो. मी कायम आपल्या सेवेत राहणार असून काँग्रेसने जे ६० वर्षात केले नाही, ते भाजपा सरकारने १० वर्षात करून दाखवले आहे, असे मोदी म्हणाले.