सोलापूर

‘संचार’चे मारुती बावडे यांना ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार प्रदान

अक्कलकोट : नयनरम्य
आणि दिमाखदार सोहळ्यात मुंबई येथील सप्ततारांकित हॉटेल आयटीसी मराठा येथे रंगलेल्या द हिंदुस्थानी पिलर ऑफ सोसायटी या देशपातळीवरील पुरस्कार सोहळ्यात अक्कलकोटचे संचारचे तालुका प्रतिनिधी मारुती बावडे यांना आशिया खंडातील विविध देशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पत्रकारितेतील द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पद्मश्री उदय देशपांडे,रशियन फेडरेशनचे काॅन्सुल ॲलेक्सी कालुगिन, ॲडिशनल डायरेक्टर जनरल फाॅरीन ट्रेडचे डॉ.आर.के. मिश्र,ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीचे आंतरराष्ट्रीय सहअध्यक्ष प्रविण लुंकड,काॅन्सुल जनरल,न्यूझीलंडचे ग्रॅहॅम रूस, काॅन्सुल जनरल,तुर्कीयचे जुनैद यावुझकान, हिंदुस्तानी शाखा,ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डाॅ.मोहम्मद अली पाटणकर आणि कार्यकारी अध्यक्ष, ट्रान्स एशियन चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीचे सुकांत डोळे, डॉ.वैशाली भिडे, ओमानचे अलबलुशी, बांगलादेशचे
चिरंजीब सरकार, चिलीचे गुस्तावो गोंझालेज, श्रीलंकेचे शिरानी अरिरत्ने, डॉ.उदय निरगुडकर, डॉ.ए.डी सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात देशपातळीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २५ जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यामध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, कर्नल एम.पी सिंग,नौशाद अली यांचा समावेश होता. प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी डॉ. संजय भिडे यांनी केले. यावेळी त्यांनी ज्या २५ पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुरस्कार दिले
गेले. त्यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
बावडे यांना आतापर्यंत राज्यस्तरीवर आणि जिल्हास्तरीय पुरस्कार अनेक मिळाले आहेत.
गेल्या २३ वर्षापासून ते पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी विविध लेख मालिका आणि बातम्यांच्या माध्यमातून जलंत समस्यांना वाचा फोडून उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे. त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला.या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना पत्रकार मारुती बावडे यांनी ग्रामीण पत्रकारितेला या पुरस्कारातून मोठे बळ मिळाले आहे. या पुढच्या काळातही सकारात्मक पत्रकारितेतून सामाजिक बदल घडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था यावर्षी २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर या संस्थेचे काम उंचावत जावे आणि त्यांनी भारताचा लौकिक करावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला आशिया खंडातील प्रत्येक देशाचे कौन्सिलर ऑफ जनरल उपस्थित होते.यामध्ये न्यूझीलंड, रशिया, जर्मनी, बेलारूस, टांझानिया, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, जॉर्डन आदी देशातील विविध मान्यवरांची हजेरी लागली होती.

Related Articles

Back to top button