क्राईम
ब्रेकिंग! पत्नी सोडून गेल्याने पतीने केले भलतेच कांड
बायको घर सोडून गेल्याच्या रागाच्या भरात दारू पिऊन दारूच्या नशेत एका बापाने आपल्या पोटच्या दोन पोरांना विहिरीत फेकले. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथे काल रात्री साडेआठ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू प्रकाश भोसले (वय ३४, रा. चौधरी कॉलनी) असे बापाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेत श्रेयस भोसले (वय ४) याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ शंभूला (वय ८) याला स्थानिकांनी वाचवले. राजू हा वेल्डरचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. राजुला श्रेयस आणि शंभू अशी दोन मुले आहेत. बायको सोडून गेल्यावर तोच त्यांचा सांभाळ करत होता. राजूचे वडील दोन्ही नातवांचा सांभाळ करत होते. दरम्यान राजूने काल रात्री खूप दारू प्यायली. या दारूच्या नशेत त्याने दोन्ही मुलांना सोबत घेतले. त्याने दोघांना चौधरी कॉलनीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत दोन्ही मुलांना ढकलून दिले.
हा प्रकार या ठिकाणी राहत असलेल्या अनिरुद्ध दहीहंडे या तरुणाने पाहिला.
त्याने क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारली. त्याने शंभूला बाहेर काढले. त्याने पुन्हा श्रेयसला शोधण्यासाठी विहिरीत उडी मारली. पण श्रेयस सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक संजय चौधरी यांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत शोध कार्य राबविले. जवानांनी बेशुद्ध श्रेयसला बाहेर काढून घाटीत दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.