राजकीय
ब्रेकिंग! पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

- विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, मात्र बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्राच्या माहितीनुसार लवकरच थोपटे हे काँग्रेसचा हात सोडणार आहे. त्यामुळे जर संग्राम थोपटेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसला पुण्यात दुसरा मोठा धक्का असणार आहे.
- काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पुणे जिल्ह्यातील भोर-मुळशी वेल्हा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. हा मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून थोपटे कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. कुठल्याही मतदार संघात काही होईल मात्र या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठींना होता.
- मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत जायंट किलर शंकर मांडेकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर संग्राम थोपटेंना चितपट केले आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. या निवडणुकीत थोपटेंचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव झाला होता.
- आता थोपटे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोपटेंच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूणच महाराष्ट्र काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.