क्राईम
जेवणात विष टाकून पाच जणांचा जीव घेतला

- रायगड जिल्ह्यातील महड गावात 2018 मध्ये घडलेल्या विषबाधा प्रकरणात मोठी न्यायिक कारवाई झाली असून प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे या सूनबाईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनवेल सत्र न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला असून, पाच निष्पाप जणांचा बळी घेतलेल्या या घटनेचा न्याय अखेर झाला आहे.
- 2018 मध्ये महड गावात वास्तूशांती कार्यक्रमाच्या दिवशी घरातील जेवणातून अचानक अनेक लोकांना उलटी, मळमळ, चक्कर, अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळातच 86 लोकांना विषबाधा झाली तर त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ठरली होती.
- तपासादरम्यान समोर आले की, ही विषबाधा नैसर्गिक नव्हे, तर हेतुपुरस्सर करण्यात आलेली होती. कार्यक्रमात जेवणात टाकलेले विषारी कीटकनाशक वरणाच्या बादलीत टाकण्यात आले होते. यामागे कुटुंबातील सून प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिचा हात असल्याचे उघड झाले.
- ज्योती हिचा सुरेश सुरवसे याच्याशी दुसरा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर कुटुंबातील लोकांकडून तिचा सातत्याने मानसिक छळ होत होता. तिच्या सावळ्या रंगावरून, स्वयंपाक न येणे, पहिल्या विवाहाचे अपयश यावरून तिला सतत हिणवले जायचे. या सगळ्याचा राग तिने मनात साठवून ठेवला होता.
- संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिने कीटकनाशक औषध वरणात मिसळले आणि हेच जेवण पाहुण्यांना दिले गेले. ज्योतीला केवळ कुटुंबीयांवरच नव्हे, तर गावकऱ्यांवरही राग होता, त्यामुळे तिने संपूर्ण कुटुंब आणि पाहुण्यांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याचे तिने कबूल केले.
- घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. विषबाधा कीटकनाशकामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयाची सुई ज्योतीकडे वळली. ती दोन-तीन दिवसांनीच रुग्णालयात गेली होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली.
- तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण पूर्णपणे उलगडले आणि अखेर न्यायालयाने ज्योतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.