महाराष्ट्र
तुम्ही दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा मात्र…

- एखादी व्यक्ती त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखली जात नाही. तर केवळ त्याच्या गुणांवरून ओळखली जाते. मी 50 हजार लोकांना सांगितले की, जो करेगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात, असे स्पष्ट वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
- नागपूरमध्ये आज दीक्षांत समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जात, धर्म, पंथ यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. तुम्ही दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा. मात्र नमाज पठणाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल. जात, पंत, भाषा लिंग आणि धर्मामुळे माणूस ओळखला जात नाही तर माणसाकडे असलेल्या गुणांमुळे माणूस मोठा होतो, असेही गडकरी म्हणाले.
- मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तर मी काय मरणार नाही. मात्र, मी माझ्या भूमिकेवर आधीपासून ठाम आहे आणि राहीन. मी आमदार असताना अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली होती. मुस्लीम समाजाला याची गरज आहे, असे मला वाटत होते. मुस्लीम समाजातून अधिकाधिक अभियंते, आयपीएस, आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल.
- माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली आज हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत, असेही गडकरींनी सांगितले.