खेळ

टीम इंडियाच्या विजयानंतर हुल्लडबाजी

  • चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रविवारी भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे. काही ठिकाणी तरुणांनी धुडगूसही घातला. असाच प्रकार मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातही घडला. आता या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत धुडगूस घालणाऱ्यांना ताब्यात घेत मुंडन केले आणि त्यांची धिंड काढली.
  • भारताने रविवारी चॅम्पियन्स ट़्रॉफी जिंकली आणि त्यानंतर देवास जिल्ह्यातील तरुण रस्त्यावर उतरले. तरुण चुकीच्या पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी करू लागले. यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या जीवितास आणि इमारतींनाही धोका निर्माण झाला. यावेळी स्टेशन प्रभारी अजय सिंह गुर्जर यांनी घटनास्थळी पोहोचत तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांशी गैरवर्तन करत वाहनाचा पाठलाग केला आणि त्यावर दगडफेक केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
  • त्यानंतर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे जबरदस्ती मुंडन केले आणि त्यांची धिंड काढली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक आमदार गायत्रीराजे पवार यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांची भेट घेतली.
  • हे तरुण भारताचा विजय साजरा करत होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. त्यांचे मुंडन करून त्यांची अशी सार्वजनिकरित्या धिंड काढणे चुकीचे आहे, असे गायत्रीराजे पवार म्हणाल्या. हा मुद्दा आपण विधीमंडळात उपस्थित करणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Related Articles

Back to top button