महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी

- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचे वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
- आता या योजनेची दुसरी बाजू समोर आली आहे. या योजनेत अपात्र महिलांना आतापर्यंत किती निधी वाटप करण्यात आला याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. या पाच लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अर्थात त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
- अपात्र महिलांकडून पैशांची वसुली करणे योग्य होणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम आता राज्य सरकारच्या तिजोरीत परत येणार नाही.