महायुतीत ट्विस्ट!
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्री कामालाही लागले आहेत. मात्र, या मंत्र्यांच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. मंत्री गाडीच्या खाली उतरत नाहीत. आमची कामे करत नाहीत, अशा तक्रारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या.
या तक्रारींची गंभीर दखल नेतृत्वाने घेतली असून नवा प्रयोग राबवण्याचे नक्की केले आहे. सरकार आणि पक्षात समन्वय राहावा तसेच कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी भाजपने 19 मंत्र्यांसाठी स्वीय सहाय्यकांच्या (पीए) नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंत्र्यांचे पीए असतील, अशी माहिती मिळाली आहे.
मंत्र्यांच्या स्वीय सहायकांबरोबर समन्वय ठेवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार राज्यातील मंत्र्यांना तीन विशेष कर्तव्य अधिकारी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.
तसेच तीन वैयक्तिक सहायक नियुक्त करण्याचा अधिकारही मंत्र्यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे या तीनपैकी दोन सहायक सरकारी कर्मचारीच असले पाहिजेत, असेही बंधनकारक नाही. इतकेच नाही तर राज्य सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दुवा म्हणून काम करणाऱ्या या सहायकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनही मिळणार आहे.
स्वीय सहायक नियुक्तीच्या या निर्णयाची माहिती देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की देऊळगावकर हे मंत्री आणि कार्यकर्त्यांत दुवा म्हणून काम करतील. कार्यकर्त्यांना ज्या समस्या भेडसावतात, त्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.