महायुतीत महाट्विस्ट!

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी दोन्ही आघाड्यांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने कालच या निवडणुका स्वबळावर लढण्याची केली होती. ठाकरे गटाच्या या गुगलीने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडे महायुती मात्र या निवडणुका एकत्रित लढण्याची तयारी करत आहे. परंतु, येथेही आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजितदादा पवार गटाकडून या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण, अजितदादा गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक माटुंगा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका निवडणूक आता स्वबळावरच लढली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाला अजूनही मुंबई जिंकता आलेली नाही. येथील यश फार नाही.
महापालिकेत चौदापेक्षा जास्त नगरसेवक कधीच निवडून आले नाहीत. दुसऱ्या पक्षांशी युतीत असतानाही पक्षाच्या जागा वाढल्या नाहीत. आता तर पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे जास्त काळजीची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या मनातही चिंतेचे मळभ आहे. त्यांच्यात एक प्रकारचा संभ्रम आहे. महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे याबाबतचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे, असेही मलिक यांनी सांगितले.



