देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX,

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. काल शिंदे यांनी लिहिलेल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीर गेल्यावर आपली मानसिक अवस्था काय होती, याबाबत एक खळबळजनक भाष्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य भाजपने चांगलेच उचलून धरले आहे.
मी गृहमंत्री असताना त्यापूर्वी मी विजय धर यांच्याकडे जात होतो आणि त्यावेळी त्यांच्याकडून सल्ला देखील घ्यायचो, त्यांनी मला सल्ला दिला की सुशील, इकडे तिकडे भटकू नकोस. तू लाल चौकामध्ये जा आणि तिथे भाषण कर. तसेच काही लोकांना भेट आणि डल झील फिरायला जा.
याशिवाय त्या सल्ल्यामधून मला खूप प्रसिद्धी देखील मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की, असा गृहमंत्री आहे जो न घाबरता जातो, पण माझी @#$%@ (आक्षेपार्ह शब्द). मी याबद्दल कोणाला सांगू, असे वक्तव्य शिंदे यांनी केले.
शिंदे यांच्या संबंधित वक्तव्यानंतर भाजप पक्षाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती होती हे शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. तसेच शिंदे यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे , असे भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावादाचे कंबरडे मोडले गेले आहे. तसेच आज लाल किल्ल्यापासूल ते लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकत आहे. याशिवाय दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट देखील झाली आहे. जिथे आधी गोळ्या झाडल्या जायच्या, पण आता तिथेच क्रिकेट खेळले जात आहे, असा दावा भाजपाने केला आहे.



