ब्रेकिंग! शरद पवारांना कोणत्या संकटाची चाहूल?

आपल्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही. निवडणुका झाल्या, पण देशावरचे संकट अजून गेलेले नाही. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सर्वांनी एकत्रित लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी खात्री देतो की, एकविचाराने सामोरे जाऊ. विजयी करण्यासाठी प्रयत्न राहतील. एकजूट कायम ठेवा कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर एकजूट कायम ठेवा, असे आवाहन केले.
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला काही प्रमाणात यश आले. याचा अर्थ संविधानावरचे संकट गेले असा अर्थ काढू नका. आज देशाची सूत्रं ज्यांच्या हातात आहे त्यांना लोकशाहीतील संस्थांबाबत आस्था नाही. देशाच्या संसदेत आपण पाहतो, पंतप्रधान किती प्रतिष्ठा ठेवतात. हे तुम्हाला येथे उपस्थित असलेले राज्यसभेचे सदस्य तुम्हाला सांगतील. लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन आताच झाले. यातील एकही दिवस मोदी सदनात आले नाहीत.
मोदी सरकारने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिष्ठ ठेवली नाही. याच कारण लोकशाही संस्थांवर विश्वास नसलेले राज्यकर्ते आज दिल्लीच्या सत्तेत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.