फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यात अलीकडे 17 हजार 471 पदांसाठी मेगा पोलीस भरतीची सुरुवात झाली आहे. 17 हजार पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे तर दुसरीकडे राज्यातील बहुतेक भागात पावसाची सुरुवात झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
उमेदवारांच्या या मागणीला विरोधी पक्षांकडूनदेखील पाठिंबा मिळत असल्याने आज राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या ठिकाणी पाऊस सुरु आहे, त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मैदानी चाचण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश युनिट्सला देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
सध्या ज्या ठिकणी पाऊस आहे, त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे ही पावसाचे दिवस आहेत आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सरकारकडून पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न होत आहे. कारण जर या चाचण्या खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. कारण अनेकांसाठी ही शेवटीची संधी ठरू शकते. त्यांना दुसरी संधी भेटत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस आहे, त्या ठिकाणी चाचण्यांसाठी दुसऱ्या तारखा देण्यात आल्या, असे फडणवीस म्हणाले.