क्राईम
वाहनाचा कट लागला अन् भयंकर घडले
वाहनाचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरुन अकोला जिल्ह्यात लाठ्या-काठ्या मारून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
देवानंद उत्तम तायडे (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हिवरखेड़ पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मारेकऱ्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापुर गावात काल रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद हा बाईकने घरी जात होता.
तेव्हा त्याच्या वाहनाचा कट रस्त्यात उभ्या असलेल्या काहीजणांना लागला. यावरून चांगलाच वाद पेटला. दरम्यान हा वाद हत्येपर्यंत पोहोचला. वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ या तरूणांनी केली होती.
या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने वार करून त्याला जखमी केले. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.