महाराष्ट्र
सीमाप्रश्न : सौंदत्ती यल्लम्मा भक्तांची वाहने अडवली

- सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो भक्तगण सौंदत्ती डोंगरावर आले आहेत. मात्र हिरेबागेवाडीजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड गुंडांनी हल्ले केल्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रातून येणार्या यल्लम्मा भक्तांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यातच कागवाड नाक्यावर पोलिसांनी काही काळ वाहने अडवून धरल्याने या तणावात भर पडली. मात्र जिल्हा पोलिसप्रमुखांनी महाराष्ट्रातील भक्तांनी बिनदिक्कतपणे यल्लम्मा दर्शनासाठी सौंदत्तीला यावे, असे आवाहन केले.
सीमा वादामुळे सीमेवरील प्रत्येक चेक पोस्टवर वाहने तपासून सोडली जात आहेत. सध्या सौंदत्ती यल्लमाची यात्रा सुरू असून आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. काही वाहनधारकांनी पोलिसांकडून अडवणूक होत असल्याच्या अफवा पसरवल्या. शिवाय जे भक्तगण सौंदत्ती डोंगरावर पोहोचले आहेत, त्यांना पुन्हा महाराष्ट्रात जाऊ दिले जाणार नाही. तणाव निवळल्यानंतरच जा, असे सांगितल्याची चर्चा होती. तथापि, असे काहीही घडलेले नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्पष्ट केले.



