हवामान
ब्रेकिंग! पुढचे दोन दिवस चिंतेचे, 15 ते 16 जिल्ह्यांना अलर्ट

- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
- फडणवीस म्हणाले की, राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाशी सतत संवाद सुरू आहे. 15 ते 16 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात रेड अलर्ट जारी असून अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या भागातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची एक तुकडी, लष्कराचे पथक तसेच पोलीस दल स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून मदतकार्य करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून सैन्याची आणखी एक तुकडी रवाना करण्यात आली आहे.
- मुंबईत गेल्या दोन दिवसांत जवळपास 200 मिमी पावसाची नोंद झाली. त्यातच आज काही तासांतच 170 मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. त्यामुळे मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, लोकल सेवा पूर्णपणे बंद नाहीत. मात्र काही गाड्या उशिरा धावत आहेत. पुढील 10 ते 12 तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून दुपारनंतर शाळांना सुट्टी दिली असून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना देखील घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे.



