महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्राने तोडगा काढला नाही तर माझ्यासह आमच्या नेत्यांना बेळगावला जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाण्यास तयार असल्याचा इशारा दिला. त्यावरून आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांनाच चॅलेंज केले आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात आलेल्या वाहनांची कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यानंतर त्याचे जशास तसे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांना हिंमत असेल तर बेळगावामध्ये या. नाही तर आम्ही तर तिकडे येतो, असे चॅलेंज केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळणार आहे.
महाराष्ट्रातून विविध संघटनांनी जशास तसे उत्तर दिल्यानंतर कर्नाटकातील वेगवेगळ्या संघटनांनीही आता महाराष्ट्राला इशारा देत, बसला काळे काय फासता, हिंमत असेल तर बेळगावमध्ये या, असे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.