महाराष्ट्र
वाहनधारकांना खुशखबर !

- वाहतुकीचे नियम मोडणे, बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वाहने चालवताना नियम मोडल्यास मोठी दंडात्मक रक्कम वसूल केली जाते. विविध वाहनांवरील केलेल्या कारवाईचा विचार केला तर दंडाची ही रक्कम हजारो कोटींच्या घरात आहे. अशातच आता दंडाच्या त्रासातून वाहनधारकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण परिवहन विभागाकडून वाहनधारकांसाठी एकरकमी परतफेडीची अभय योजना आणण्याचा विचार केला जात असल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- एकरकमी परतफेडीची अभय योजना म्हणजे बाईक, चारचाकी तसेच अवजड वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच यामुळे राज्याच्या तिजोरीतही एकरक्कम जमा होण्यास मदत होणार आहे. एकट्या मुंबईत विविध वाहनांवर केलेल्या कारवाईची रक्कम ही एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. ही दंडाची रक्कम कितीही वाढली तरी तो न भरण्याचीच भूमिका अनेक वाहनधारक येत असतात. मात्र या नव्या नियमांमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
- याबाबतचा प्रस्ताव राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी परिवहन सचिवांकडे पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ओटीएस देताना शंभर टक्के दंड वसूल न करता त्यामध्ये मोठी सूट दिली जाईल, ऑटो तसेच बाईक वाहनधारकांनी २५ टक्के रक्कम भरल्यास त्यांचा उर्वरित ७५ टक्के दंड माफ केला जाईल, असा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- ही दंडाची रक्कम वाहनधारक १५ दिवसांच्या आत भरणार असतील तर त्यांना ५० टक्के दंड माफ करावा, असेही या प्रस्तावात आहे. या अभय योजनेत बाईक, तीनचाकी वाहनांवरील दंडाची रक्कम ही महागड्या गाड्यांपेक्षा कमी असेल. ज्यामुळे सरकारला दंड आकारणीतून एकावेळी मोठी रक्कम मिळेल, असा त्यामागे हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.



