क्राईम
ब्रेकिंग! मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व दोषींची निर्दोष मुक्तता

- मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल सुनावला असून सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने एकूण 12 दोषींना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे या दीर्घकाळ चाललेल्या खटल्याला नवे वळण मिळाले आहे.
- मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत सात स्फोट झाले होते. या हल्ल्यात 189 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 827 नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाने तपास करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा अंतर्गत नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
- सत्र न्यायालयाने 2015 मध्ये 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. यामध्ये पाच जणांना फाशी, तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दोषींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकारने मात्र फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठी याचिका दाखल केली होती.
- मुंबई हायकोर्टाने आज सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे, तथ्यहीन आणि विसंगत होते. त्यामुळे कोणत्याही आरोपीला दोषी ठरवता येत नाही. यामुळे 19 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा शेवट न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेगळ्या वळणावर पोहोचला आहे.
- या प्रकरणातील एक आरोपी तपासा दरम्यान मरण पावला होता. उर्वरित आरोपी नाशिक, अमरावती, नागपूर आणि येरवडा जेलमध्ये होते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली होती. आजच्या निर्णयामुळे ते सर्व आरोपी आता तुरुंगाबाहेर येणार आहेत.



