राजकीय
अजित पवारांचा राजकीय ‘धमाका’

- राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी घडामोड समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
- लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यावर अजितदादा पवारांबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र विधानसभेतील यश, सत्ता टिकवणे आणि उपमुख्यमंत्रिपद पुन्हा मिळवणे यात अजितदादा पवारांनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते त्यांच्या गटात सामील होण्यास उत्सुक आहेत.
- या चार माजी आमदारांमध्ये शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा समावेश आहे. या नेत्यांनी मिरज येथील सरकारी विश्रामगृहात झालेल्या गुप्त बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीत अजितदादा गटाचे नेते निशिकांत पाटील देखील उपस्थित होते.
- या बैठकीत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारांशी थेट चर्चा होणार असून त्यानंतर पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- या घडामोडीमुळे शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील हे देखील सांगली जिल्ह्यातीलच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील गटातील दोन आमदार सध्या कार्यरत आहेत. मात्र चार माजी आमदारांचा अजित पवार गटात होणारा प्रवेश हा सांगलीतील सत्ता समीकरण पूर्णतः बदलू शकतो.



