सोलापूर
1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी

- भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारावरून आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या पाकिस्तानसोबतच्या संघर्षाची तुलना 1971 च्या युद्धाशी केली जात आहे. काँग्रेसने 1971 च्या युद्धावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकून सोशल मीडियावर मोदी सरकारच्या युद्ध धोरणावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
- सत्य आहे की, 1971 मधील परिस्थिती 2025 मधील परिस्थिती सारखी नाही. दोघांमध्ये नक्कीच फरक आहे. पण सध्या आपण अशा परिस्थितीत पोहचलो आहोत, जिथे तणाव नियंत्रणाबाहेर जात आहे. परंतु सध्या भारतासाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असले पाहिजे. भारतातील लोक शांततेला पात्र आहेत. आपण खूप त्रास सहन केला आहे. मी असे म्हणत नाही की, आपण युद्ध थांबवावे. परंतु भारताने आता दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे उगाच आता युद्ध चालू ठेवण्यात अर्थ नाही. भारताने आता आपल्या आर्थिक प्रगतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रिय केले पाहिजे. दीर्घकालीन युद्धात अडकू नये, अशी भूमिका थरूर यांनी मांडली.
- 1971 चे युद्ध बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले होते. त्या युद्धाचे नैतिक उद्दिष्ट होते. भारत लोकांना स्वातंत्र्य देण्यासाठी नैतिक लढाई लढत होता. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानची लष्करी भूमिका, तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक विचारसरणी बदलली आहे. आता पाकिस्तानसोबत दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवले, तर दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. परंतु आजच्या भारताला फक्त सूड हवा नाही तर स्थिरता हवी आहे, असेही थरूर यांनी सांगितले.



