महाराष्ट्र
ब्रेकिंग! अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल

- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची लेखी परीक्षा परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरू व्हायला अवघे चार दिवस बाकी असल्याने शिक्षण विभाग कामाला लागला असून कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महत्त्वाचे म्हणजे कॉपीमुक्त अभियानासाठी संवदेनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.
- अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार असून कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश आणि परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो. असे असले तरी एका महाविद्यालयातील उपप्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
- छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय शिक्षण मंडळात परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि संभाजीनगर या 5 जिल्ह्यातील बारावी परीक्षांच्या केंद्र संचालकांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांच्यासमोर परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी कॉपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.
- त्यांनी म्हटले की, आम्हाला कॉपीमुक्त अभियान राबवायचे आहे. यासाठी आम्ही ज्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून जाणार आहोत, तिथे हत्यारबंद पोलीस बंदोबस्त द्या अन्यथा आमचा संतोष देशमुख होऊ शकतो, अशी भीती विजय घोडके यांनी बैठकीमध्ये सर्वांसमोर बोलून दाखवली आहे.



