महाराष्ट्र
ब्रेकिंग! अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार?

- लाडकी बहीण योजनेची खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
- सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते. त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड (परतावा अधिकारी) तयार करून देतील. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील. इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम (नियमित परतावा प्रणाली) असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचै पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील, असे तटकरे म्हणाल्या.
- आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे. त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत. ज्या महिलांनी उत्पन्नापलिकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल, त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे (क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टिम) समोर येतील. तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या आहेत, तसेच गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे, त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल, असेही ते म्हणाल्या.
- तटकरे म्हणाल्या, आम्ही सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहोत. आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की, अशा पद्धतीने ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावे आणि आपले अर्ज मागे घ्यावेत.