महाराष्ट्र
ब्रेकिंग! मुंबई हायकोर्टाचे ताशेरे, तरीही उद्या महाराष्ट्र बंद होणार का?
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. परंतु, कोणत्याही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मनाई असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले. दोन बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते, अशी पोस्ट पवार यांनी सोशल मीडियावर केली आहे.