- गेल्या काही दिवसांपासून राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असून या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंदला अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात काल पुणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पाडली. या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवी यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती आणि आम्ही ते पकडले होते. योग्यवेळी चॅट समोर आणू, असा युक्तीवाद केला होता. तर आता या प्रकरणात वैष्णवी यांचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे.
- वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न जमले होते. मात्र हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुटले. त्यामुळे नाईलाजाने मला मुलीचे लग्न करावे लागले, असा मोठा गौप्यस्फोट केला. तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हगवणेंच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. काल झालेल्या सुनावणी दरम्यान हगवणेंच्या वकिलांनी आमच्याकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याने आम्ही 40 लाखांच्या एका फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू, असा युक्तीवाद केला होता.
- या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल यांनी वकिलांचा हा दावा खोडून काढला. आरोपींकडे पाच कोटींच्या गाड्या नसून आम्ही दिलेलीच गाडी आहे. लग्नाआधी एमजी हेक्टर गाडी बुक करण्यात आली होती. पण त्यांनी धमकी देत फॉर्च्युनर गाडी घ्यायला लावली, असा दावा देखील अनिस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.
- या पत्रकार परिषदेमध्ये अनिल कस्पटे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तसेच आत्महत्येपूर्वी वैष्णवीला पाच ते सहा दिवस मारहाण करण्यात आली होती, असा गंभीर आरोप अनिल यांनी केला.
अश्रूंचा बांध फुटला! बंदुकीचा धाक ते लग्न मोडण्याची धमकी
