एक एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार

देशात एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसणार आहे. त्यामुळे देशात एक एप्रिलपासून बँकिंग क्षेत्रात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याची माहिती असणे आवश्यक आहे. देशात एक एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणे, किमान शिल्लक रक्कम, चेक पेमेंट सुरक्षा, डिजिटल बँकिंग, बचत खाते आणि मुदत ठेव (एफडी) व्याजदर तसेच क्रेडिट कार्ड सर्विसच्या नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.
एक एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त 20 ते 25 रुपये शुल्क मोजावा लागणार आहे. यापूर्वी दुसऱ्या एटीएममधून पाच वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येत होती मात्र एक एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या एटीएममधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत.
तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक सह अनेक मोठ्या बँका एक एप्रिलपासून किमान शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू करणार आहेत. त्यामुळे एक एप्रिलपासून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार ग्राहकांना किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे आणि जर किमान शिल्लक ठेवली नाही तर ग्राहकांवर दंडाची कारवाई होणार आहे.
डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी बँका नवीन ऑनलाइन सेवा आणि एआय-चालित चॅटबॉट्स सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर एक एप्रिलपासून डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी मजबूत केली जाणार आहे.



