- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अभियोक्ता पक्षाने गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधातील उठवादरम्यान केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध गुन्हा असल्याचा ठपका ठेवला आहे. आज अभियोक्त्याने याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
- आरोप सिद्ध झाले तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षासुद्धा होऊ शकते. या दोषारोपपत्रात हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमा खान कमाल आणि माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी मामून हे सहआरोपी आहेत. या खटल्याचे बांगलादेशातील टीव्हीवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकता कायम असेल.
- शेख हसीना यांच्यावर लावलेल्या आरोपात गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेला हिंसाचार आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला गोळीबार, सामूहिक हत्याकांड करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 12 मे रोजी तपास अधिकाऱ्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये शेख हसीना यांचा या हत्याकांडामागे हात असल्याचे म्हटले होते. त्यांनीच याविषयीचे आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- तख्तपालट नंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशात एका खास गटाने सत्ता उलटण्यासाठी हिंसाचार घडवून आणला होता. त्यानंतर हसीना यांनी भारतात पलायन केले. बांगलादेशातील सध्याचे युनूस सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याची मागणी करत आहे. पण, भारताने त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ब्रेकिंग! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना होणार मृत्यूदंडाची शिक्षा?
